पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Rajarampuri
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसलेले असताना आईवडीलांच्या छ्त्रछायेखाली निरागस आणि संपन्न बालपण अनुभवले त्याची आणि त्याबरोबरच जुन्या राजारामपुरीची आठवण होतेय….1960 ते 75 चा तो काळ……राजारामपुरी शांत, निवांत, वर्दळ नाही,वाहनांचा गोंगाट नाही अशी होती .भरपूर झाडी..शुक्रवारी रात्री अंबाबाईच्या देवळातील तोफेच आवाज ऐकू येई.सगळी घरे दक्षिण-उत्तर, आगगाडीचा डबाच जणू.दक्षिणेकडे दरवाजा असला तरी कुणाच्या मनात वास्तूशास्त्र येत नसे. सगळी कौलारु बैठी घरे आणि चाळी. त्यात घरमालक अणि भाडेकरू अशी 1 किंवा 2,3 खोल्यात मध्ये आनंदाने राहणारी माणसे होती.तशीच काही दुमजलीही दगडी बंगले होते. ते होते भोसले,मथुरे,परदेशी,पेंढारकर यांचे.शाहूकालीन A A पाटील यांचा बंगला. तिथं भरपूर झाडी असलेले भरपूर मोकळी जागा असलेले. त्यांच्याबद्दल कुतुहल वाटायचे
बाकीच्या घरांनाही पुढे अंगण.मेंदीचे कुंपण, त्यावर पिवळी वेल असायची.आम्ही त्याचा चष्मा करत असू. सगळे तसे मध्यमवर्गीय. एकमेकांना नावानिशी ओळखणारे होते.जिव्हाळा, आपुलकी, होती.आमच्या लहान मुलांचा गल्लीबोळातून मुक्त संचार असायचा. प्रत्येक घरी 4, 5 मुले असत.मित्र मैत्रिणींचे भाऊ-बहिणी आपलेच वाटत. चोर पोलीस , विटीदांडू, जिबली, दोरीच्या उड्या,लंगडी,लंपडाव पाय दुखेपर्यंत किंवा कुणीतरी ओरडून बंद केल्यावरच घरी आम्ही घरी परत येत असू. तसच हादग्याला तर प्रत्येक घरी जायचच.
मेनरोडवर बस रूट. फारशी दुकाने नव्हती.प्रकाश भांडार, पिळणकर, झेंडे किर्लोस्कर.टोणमारे यांची किराणा मालाची दुकाने.सोरपांची चिरमुरे भट्टी होती. गिरणी,वखारी,बेकऱ्या मोजक्याच होत्या. वाचनालयं होती सागर, नयना, विलास, त्यावेळी सगळे वाचत होते.
भांडी, कपडे यासाठी गावात जायला लागायचे. बसने जायचे अणि यायचे..बसने जाताना बागल चौकात कब्रस्तान आले की डोळे मिटुन बसायचे तिकडे बघायला भिती वाटायची.वहाने जास्त नव्हती.ambsador आणि वेस्पा फार कमी.टांग्यातून स्टँड़वरुन यायला लागत असे. बहुतेक 1960 ला रिक्षा चालू झाल्या
टेंबलाईवर राजारामपुरीवाल्यांची फार भक्ती. जत्रेला.जत्रेला चालत जाता येई. पूर्वेला सगळी कडे शेती होती.वाटेत मोठा ओढा होता.त्याला पाणीपण असायचे.
शाळा म्हणजे अस्वले गुरुजीची गोखले विद्यालय, बेनाडीकरांचं राम विद्यालय, पाटणे हायस्कुल.ताराराणी विद्यापीठ म्हणजे प्रचंड आवार असलेली शाळा. V T पाटलांची.
दरवेशी,कडकलक्ष्मी आली किंवा म्हातारीचा कापूस, कल्हाई करणारे आले की त्यांचे काम होईपर्यंत बघत बसायचे अणि कल्हईनंतर चांदीचे मणी गोळा करायचे.
राजारामपुरी म्हटले की शाहू मिल आणि कोटीतिर्थ पहिजेच.मिलचा भोंग्याशी आमचं नातंच आहे.दुपारी 11 आणि 3 वाजले भोंगा होत होता.मिलजवळ पण शेती होती. निसर्गसुन्दर कोटीतिर्थमध्ये गणेश विसर्जन होत होते.
1 ते 12 गल्ल्या होत्या, शेवटच्या गल्लीचे मारूती मंदीर साधे होते आणि राजारामपुरीचे श्रद्धास्थान होते. शनी आणि रेणुकामातेचे मंदीर नंतर झाले.मारूती मंदिरा शेजारच्या तालमीत पहिलवान लोक सराव करत असत.त्या पलीकडीलच्या रस्त्याजवळ एका रात्रीतून वसलेले म्हणून “अवचित नगर” आम्ही वसताना पाहिलंय. डॉ विजय कारांडेंसारखे देवाप्रमाणे असणारे डॉ आम्हाला लाभले.चंद्रकांत आणि सूर्यकांत यांची रामलक्ष्मणाची जोडी…वि.स.खांडेकर…बाबुराव पेंढारकर, माधवराव शिंदे यांच्या सारखी माननीय आदरणीय लोकोत्तर व्यक्तीमत्वे बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.पण आत्ता राजारामपुरी अपार्टमेंटमध्ये हरवली
2 thoughts on “राजारामपुरी | Rajarampuri”